राष्ट्रवादीचे सर्व नेते निर्दोषच
भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला

लोकवार्ता । प्रतिनिधी
आयकर विभागाने पुणे, सातारा आणि नंदुरबार परिसरातल्या पाच साखर कारखान्यांवर धाड टाकत कारवाई केली आहे. किरीट सोमय्या यांनी या साखर कारखान्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यात जरंडेश्वर साखर कारखान्याचाही समावेश आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय कारखान्याच्या संचालकपदी असल्याचीही माहिती मिळत आहे. याविषयी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील यांनी पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, “भाजपाचे पुढारी आमच्या नेत्यांची नावं घेतात आणि पाठोपाठ ईडी, सीबीआय येते. आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं कारस्थान भाजपाने केलं आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे, हे विचार करण्यासारखं आहे. पण आमचा कायद्यावर विश्वास आहे. छगन भुजबळ यांनाही असाच त्रास देण्याचा प्रयत्न झाला मात्र ते निर्दोष सुटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही तरी त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे. या देशातल्या सर्व तपास यंत्रणा भाजपा चालवत आहे”.
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, “लखीमपूरला घडलेल्या घटनेबद्दल काल राज्य मंत्रिमंडळाने खेद व्यक्त केला आहे. आम्ही सर्व पक्षांच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी महाराष्ट्र बंदचा पुकारा केला आहे आणि त्यामुळे संतापून जाऊन भारतीय जनता पार्टीने त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लखीमपूरच्या दुर्घटनेला भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे. भारतातला सर्व शेतकरी आता पेटून उठला आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं धाडसत्र करुन लक्ष वळवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे”.