“जालना साखर कारखाना प्रकरणात किरीट सोमय्यांचा आणखी एक खुलासा”
जालना साखर कारखाना घोटाळ्यात विश्वास नांगरे पाटलांच्या सासऱ्याचे आणि पत्नीचे नाव-किरीट सोमय्या.
पिंपरी ।लोकवार्ता-
भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आणखी एक कथित घोटाळा बाहेर काढला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याप्रमाणेच जालना सहकारी साखर कारखाना अर्थात अर्जुन शुगर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात देखील घोटाळा झाला आहे. यामध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. यामध्ये मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी रुपाली नांगरे पाटील आणि सासरे पद्माकर मुळे यांची नावे आली आहेत.
तसेच या कारखान्याचे मालक अर्जुन खोतकर यांच्यासह कारखान्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीची तसेच आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. पिंपरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, “औरंगाबाद येथे मी अर्जुन खोतकर यांचा जालना सहकारी साखर कारखान्याचा घोटाळा बाहेर काढला.
या कारखान्याचे मालक अर्जुन शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी आहे. ही कंपनी अर्जुन खोतकर यांची आहे. खोतकर यांनी कारखान्याच्या खरेदीत 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. खोतकर यांनी 2012 पासून जालना सहकारी साखर कारखाना खरेदी करण्यासाठी तापडीया आणि मुळे यांच्या कंपन्याचा आधार घेतला. हा कारखाना खरेदी करण्यासाठी 42 कोटी 62 लाख 18 हजार रुपये अर्जुन खोतकर यांनी दिले असल्याचे तापडिया यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दिले आहे. हे पैसे अर्जुन खोतकर यांच्याकडे कुठून आले, याचे उत्तर ठाकरे सरकारने द्यावे.
त्यानंतर 42 कोटी 62 लाख 18 हजार रुपयांना खरेदी केलेला कारखाना तापडीया यांच्या कंपनीने पुन्हा खोतकर यांच्या अर्जून शुगर इंडस्ट्रीजला 27 कोटीत विकल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. जे अजित पवारांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या बाबतीत केलं, तेच अर्जुन खोतकरांनी जालना सहकारी साखर कारखान्यात केलं आहे असा आरोपही सोमय्या यांनी केला.

“अर्जुन शुगर प्रा ली या कारखान्याला आता दोन मालक आहेत. एक म्हणजे खोतकर परिवार आणि दुसरे अजित सीड्स प्रायव्हेट लिमीटेड. या अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये पद्माकर मुळे आणि परिवार तसेच रुपाली विश्वास नांगरे पाटील हे भागीदार आहेत. रुपाली पाटील यांचे पती विश्वास नांगरे पाटील हे मुंबईचे सह पोलीस आयुक्त आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या कारखान्याची चौकशी सुरु करण्याचा आदेश दिला. याबाबत चौकशी सुरु झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी चौकशी बंद करून क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला. पण आता या प्रकरणाची सीबीआय अथवा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी झाली पाहिजे. तोपर्यंत विश्वास नांगरे पाटील यांना पोलीस दलातून मुक्त करा, असेही सोमय्या म्हणाले.
या कारखान्यात हजारो शेतक-यांची जमीन गेली आहे. त्याची किंमत आता 950 कोटी रुपये आहे. अर्जुन शुगर इंडस्ट्रीजच्या सर्व व्यवहारांची, कारखान्याशी जोडलेल्या सर्व व्यक्तींची चौकशी व्हायला हवी, या मागणीसाठी मी उद्या दिल्लीला जाणार आहे. ईडी, कंपनी मंत्रालय, सहकार मंत्रालय या सर्वांची भेट घेणार आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात या प्रकरणात ठाकरे सरकारने काय कारवाई केली, याचा हिशोब भारतीय जनता पार्टी मागणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे.