महाराष्ट्रातील हिंसाचाराच्या घटनांचा शहर भाजपातर्फे निषेध
-पिंपरी-चिंचवडमधील तहसील कार्यालयावर आंदोलन.
-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन.
पिंपरी|लोकवार्ता-
त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. हजारो लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला गेला. याचा पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच, दंगली घडवणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसील अधिकाऱ्यांद्वारे निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ.उमाताई, महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे,मोरेश्वर शेडगे,माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, महिला अध्यक्ष उज्वला गावडे, शहर उपाध्यक्ष अनिल लोंढे, समीर जावळकर, आर एस कुमार, बाळासाहेब भूंबे, युवा मोर्चा सरचिटणीस दीपक नागरगोजे, दिनेश यादव, नरेंद्र येलकर,कैलास सानप, , कोमल शिंदे, सचिन तापकीर,कुंदा भिसे, पल्लवी वाल्हेकर, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष सुभाष सरोदे आदी उपस्थित होते.

शहराध्यक्ष महेश लांडगे म्हणाले की, जमावाने केलेल्या हिंसाचाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून प्रामुख्याने अमरावतीमध्ये लोक रस्त्यावर उतरले. ते कोण्या एका पक्षाचे नव्हते व कोणी त्यांचे नेतृत्व करत नव्हते. स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरही हल्ले केले गेले. त्यानंतर पोलीस यंत्रणेकडून पक्षपाती पद्धतीने कारवाई केली जात आहे. अफवा पसरवून दंगल करणाऱ्यांना पाठीशी घालून स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या सामान्य लोकांना मात्र पोलिसांकडून लक्ष्य केले जात आहे.
काय आहेत भाजपाच्या मागण्या?
– त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत झाली पाहिजे.
– ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक केली पाहिजे.
– दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे.
– स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी.
– भारतीय जनता पार्टीचे नेते – कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. अशा विविध मागण्या शहर भाजपाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
