फडणवीसांनी दहशतवादी सरकारी पदांवर बसवले
अंडरवर्ल्डच्या लोकांना तुम्ही मुख्यमंत्री असताना सरकारी आयोग आणि मंडळांचे अध्यक्ष का केले-नवाब मलिक
मुंबई ।लोकवार्ता-
बॉम्बस्फोटातील दहशतवादी आरोपीकडून जमीन विकत घेतली, असे आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले , हे आरोप बिनबुडाचे असून, फडणवीस यांचे गुन्हेगारांसोबत असलेल्या संबंधांचा स्फोट करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.
“महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर आरोप लावले त्याचा खुलासा मी केला. मी मंत्री असताना सलीम पटेलबाबत तुम्हाला माहिती नव्हती का असे देवेंद्र फडणवीसांनी विचारले होते. २००५ मध्ये मी मंत्रीपदावर नव्हतो. आम्ही संपत्ती खरेदी केल्यानंतर सलीम पटेलचा व्हिडीओ व्हायरला झाला होता. पाच महिन्यांपूर्वी मला माहिती मिळाली की त्यांचा मृत्यू झाला आहे. शाहवली खानसोबत व्यवहार केल्याचे त्यांनी म्हटले. २००५ मध्ये तो आरोपी नव्हता. तिथल्या जागेच्या वॉचमनचा तो मुलगा होता आणि त्याने त्या जागेच्या कागदपत्रांवर त्याचे नाव लावले होते. ते काढण्यासाठी आम्ही त्याला पैसे दिले हे सत्य आहे,” असे नवाब मलिकांनी सांगितले.

“एनसीबीमध्ये सुरु असलेल्या वसुली प्रकरणाला देवेंद्र फडणवीस दुसरीकडे वळवण्याचे काम करत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस त्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्या अधिकाऱ्याचे आणि फडणवीसांचे जुने संबंध आहेत. २००८ मध्ये आलेला अधिकारी १४ वर्षे मुंबईतच आहे यामध्ये काय कारण आहे. देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांवर आरोप करतात की अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत. अंडरवर्ल्डच्या लोकांना तुम्ही मुख्यमंत्री असताना सरकारी आयोग आणि मंडळांचे अध्यक्ष का केले? मुन्ना यादव नावाचा एक कुख्यात गुंड ज्याच्यावर हत्येपासून सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि तो तुमचा राजकीय साथीदार आहे. त्या मुन्ना यादवला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष बनवले होते की नाही. तुम्ही हैदर आजम नावाच्या एका नेत्याला मौलाना आझाद फायन्सान कॉर्पोरेशनचा अध्यक्ष बनवले होते की नाही.
हैदर आजम बांग्लादेशातल्या लोकांना मुंबईत आणण्याचे काम नाही करत का? हैदर आजमची दुसरी पत्नी जी बांग्लादेशी आहे ज्याची चौकशी मालाड पोलिसांनी केली होती. पोलीस जेव्हा तपास करत होते तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातून ते प्रकरण दाबण्याचे काम तुम्ही केले होते की नाही. तुमच्या इशाऱ्यावर संपूर्ण महाराष्ट्रात वसुलाची काम होत होते की नाही. मुंबईच्या बिल्डरांच्या जागेचे भांडणवरुन पोलिसांत तक्रार करुन वसुली केली जात होती की नाही. जमिनींच्या मालकांना पकडून आणून त्या आपल्या नावावर केल्या जात होत्या की नाही. तुमच्या कार्यकाळात परदेशातू कुख्यात गुंड फोन करायचे, असे मलिक म्हणाले.