लस घेतल्यानंतरही २.५ लाख लोकांना कोरोना
८७ हजार ४९ जणांना ब्रेकथ्रू इन्फेक्शन

लोकवार्ता । प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूपासून संरक्षण व्हावे यासाठी लस घेतल्यानंतरही अडीच लाख लोकांना कोविड-१९ ची बाधा झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण दोन लाख ५८ हजार ५६० जणांना लस घेतल्यानंतरही (ब्रेकथ्रू इन्फेक्शन) कोरोना झाला आहे.
या संख्येत लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर एक लाख ७१ हजार ५११ जणांना तर दुसरी मात्रा घेतल्यानंतर ८७ हजार ४९ जणांना ब्रेकथ्रू इन्फेक्शन झालेल्यांचा समावेश आहे. देशात लसीकरण मोहिमेत कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक लसीच्या बेकथ इन्फेक्शनच्या घटना घडल्या आहेत. या लसींच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेनंतरही ब्रेकथ्रू इन्फेक्शनचे प्रकार समोर आले आहेत. एकूण लसीकरणाच्या ०.४८ टक्के ब्रेकथ्रू इन्फेक्शन आतापर्यंत नोंद झाले.
४०,१२० नवे रुग्ण
देशात शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे ४०.१२० नवे रुग्ण आढळले तर ५८५ जणांचा मृत्यू झाला. देशात आता मृतांची एकूण संख्या ४,३०,२५४ झाली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून ३,८५,२२७ वर आली आहे.