मुंबईतील ६ किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तातडीने विकास आराखडा करा !
६० किल्ले राज्य संरक्षित

लोकवार्ता । प्रतिनिधी
मुंबईतील सहा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी एकत्रित विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. मुंबईतील शिवडी, वरळी, वांद्रे, धारावी, सेंट जॉर्ज आणि माहिम अशा सहा किल्ल्यांसाठी हा विकास आराखडा तातडीने तयार करण्यात यावा अशा सूचना अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात गड- किल्ल्यासंदर्भात अमित देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत हे महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. तसेच १८ संरक्षित किल्ल्यांच्या संवर्धनाबाबतचा अहवालही तातडीने द्यावा असेही निर्देश देण्यात आले आहेत.
“मुंबईतील सर्व सहा किल्ल्यांचा विकास आराखडा एकत्रितपणे तयार करण्यात यावा. त्याचसोबत, येत्या आठ दिवसांत राज्यातील एकूण सागरी किल्ल्यांसाठी विकास आराखडा आणि राज्य संरक्षित एकूण ६० किल्ल्यांचा विकास आाराखडा असे तीन वेगवेगळे विकास आराखडे सादर करण्यात यावेत. लातूर जिल्हयातील औसा आणि उद्गीर किल्ल्यांच्या संवर्धन कामासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याबाबतची पुढील कार्यवाही तातडीने करण्यात यावी”, अशाही सूचना अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.
एकूण ६० किल्ले राज्य संरक्षित
अमित देशमुख यांनी यावेळी आणखी काही सूचना दिल्या आहेत. “महाराष्ट्रातील एकूण ६० किल्ले राज्य संरक्षित किल्ले म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या किल्ल्यांची डागडुजी, दुरुस्ती आणि संवर्धनाची कामं ही पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत करण्यात येत आहेत. मात्र, असं असलं तरीही वित्तविषयक तज्ञ सल्लागार नेमून या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वित्त संस्थांकडून कर्ज पुरवठा कसा होऊ शकेल? याबाबतची शक्यता तपासून घ्यावी. या तज्ञ सल्लागारांनी दिलेला अहवाल त्यानंतर सरकारला सादर करावा”, असं सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले.
गड-किल्ले हे महाराष्ट्राचं भूषण आहेत. हा एक ऐतिहासिक आणि वैभवशाली ठेवा आहे. तो जपणं आणि त्याच संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यादृष्टीने, राज्य सरकारने ही काही पावलं टाकायला सुरुवात केली आहे, असं म्हणता येईल.