इंद्रायणी प्रदूषणबाबत सहा कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल
लोकवार्ता : पिंपरी महापालिकेच्या सांडपाणी वाहिन्यांद्वारे कंपन्यांतील रसायनयुक्त सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडल्याचे तपासणीत आढळून आले आहे. या प्रकरणी चिखली परिसरातील सहा कंपन्यांच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या जलनिःसारण विभागातर्फे फिर्याद दिली आहे.

शहराच्या उत्तर सीमेवरून इंद्रायणी नदी वाहते. तळवडेपासून डुडुळगावपर्यंत आणि आळंदी हद्दीपासून चऱ्होलीपर्यंत नदीची हद्द आहे. चिखलीपासून मोशीपर्यंत नदीच्या परिसरात कंपन्या आहेत. शिवाय, भोसरी ‘एमआयडीसी’तील बहुतांश कंपन्यांचे सांडपाणी नदीकडे प्रवाहित होते. नैसर्गिक नाल्यांद्वारे ते नदीला मिळते. मात्र, काही कंपन्या व लघुउद्योजकांनी कंपन्यांमधील सांडपाणी महापालिकेच्या सांडपाणी वाहिन्यांना जोडल्याचे तपासणी आढळून आले. अशी कंपन्यांना नोटीस देण्यात आल्या. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले.
नाल्यांद्वारे नदीत रंगीत पाणी मिसळत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानुसार जलनिःसारण विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर महाजन व कनिष्ठ अभियंता स्वामी जंगम यांच्या पथकाने पाहणी केली असता, सहा उद्योजकांनी त्यांच्या कंपन्यांतील सांडपाणी वाहिन्या घरगुती सांडपाणी वाहिन्यांना जोडल्याचे आढळून आहे.
मारुती लोंढे (क्वालिटी कोटिंग वर्क्स, शेलारवस्ती), कुमार मोहन प्रजापती (डायनामिक प्लास्टिक इंडस्ट्रीज), मोरेश्वर मुंगसे (ओम इंडस्ट्रीज), सचिन साठे (वरद इन्फोटेक), सुरेश अग्रवाल (हरिदर्शन प्रा. लि.), विश्वेश देशपांडे (टेक्सेव्ही मॅकेनिकल) यांनी कंपन्यांतील सांडपाणी वाहिन्या महापालिकेच्या ड्रेनेज लाइनला जोडल्याचे निदर्शनास आले आहे.
इंद्रायणी नदीच्या काठी भराव करून अनधिकृत शेड, इमारती बांधण्याचे काम बेकायदेशीरपणे चालू आहे. सदर विनापरवाना बांधकामे, शेड बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात फिर्याद नोंदविण्यात येईल. तसेच विनापरवाना बांधकाम तोडण्यात येतील. नागरिक, उद्योजकांनी कोणत्याही प्रकारचे विनापरवाना बांधकाम करू नये. बांधकाम करण्यापूर्वी रीतसर परवानगी घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करणेत येईल.