पोलीस भरतीच्या घोषणेनंतर मराठा संघटना आक्रमक, मुंबईमध्ये “18 ठिकाणी ठिय्या आंदोलन”

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारने आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी (२० सप्टेंबर) जवळपास १८ ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व नियमांचं पालन करून मुंबईत ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. मुंबई लगतच्या शहरांमध्ये देखील एकाचवेळी ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.
मराठा बांधवांनी आपापल्या विभागातील ठरलेल्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला हजेरी लावण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा, महामुंबई यांच्यातर्फे करण्यात आले होते. त्यानंतर आता ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. ‘शिवसेना आतापर्यंत आंदोलन करुनच मोठी झाली आहे. मग आम्ही आंदोलन करतोय तर त्याला आक्षेप का?’ असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
मुंबईतील ‘या’ 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन
१. प्लाझा सिनेमा,दादर (प)
२. भारतमाता टॉकीज, लालबाग
३. शिवाजीराजे पुतळा, पांजरपोळ, चेंबूर
४. वरळी नाका, वरळी
५. गिरगाव चर्च, गिरगाव
६. कला नगर जंक्शन, बांद्रा (पू)
७. शिवस्मारक, विमानतळ, पश्चिम दृतगती, मार्ग, विलेपार्ले(पू)
८. जोगेश्वरी रेल्वे स्थानक (पू)
९. शाम नगर तलाव, जोगेश्वरी (पू)
१०. दहिसर रेल्वे स्थानक (पू/प)
११. शिवाजी चौक, बरकत नाका, वडाळा (पू)
१२. संगमेश्वर मंदिर, कुर्ला (प)
१३. साईबाबा मंदिर, मानखुर्द (प)
१४. मराठी विद्यालय, पंतनगर, घाटकोपर (पू)
१५. गणेश मंदिर, भटवाडी, घाटकोपर (प)
१६. शिवाजी महाराज पुतळा, कन्नमवार नगर-२, विक्रोळी(पू)
१७. आयआयटी गेट समोर, पवई
१८. शिवाजी तलाव, भांडुप (प)
सर्वांच्या सोबतीने लढाई जिंकू – मुख्यमंत्री
मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. सगळ्यांना विश्वासात घेऊ, विरोधी पक्ष नेत्यांशी या विषयावर बोलण्यात येईल. सरकार सुरुवातीपासून याबाबत प्रामाणिक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.