रात्रीच्या पाणी पुरवठा समस्येने मोशीकर त्रस्त
-मोशीतील काही भागामध्ये सध्या रात्रीचा पाणीपुरवठा सुरू ;नागरिकांची झोप उडाली.
मोशी| लोकवार्ता-
मोशीतील काही भागामध्ये सध्या रात्रीचा पाणीपुरवठा सुरू आहे . शहराला समन्याय पद्धतीने पाणी मिळावे या हेतूने पाण्याचे वाटप करण्यात आले आहे . मात्र , सोसायटी परिसर वगळता गावठाण व चाळीच्या भागांमध्येही रात्रीचा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत .
नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळू नये तसेच सोसायटीमध्ये पाण्याची साठवण क्षमता अधिक असल्याने रात्रीचा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले . रात्री नऊ ते पहाटे चार या वेळेत बऱ्याच भागांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे . मात्र , रात्री नऊ ते बारा , बारा ते अडीच व अडीच ते साडेचार या वेळेत पाणी येणाया नागरिकांची धांदल उडत आहे .काबाडकष्ट करणाऱ्या वर्गाची अवेळी पाण्याने सुखाची झोपच हिरावून घेतली आहे . दिवसा काम करून रात्रभर पाण्यासाठी पहारा द्यावा लागतोय , अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे . याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे समोर आले आहे .

सोसायट्यांप्रमाणे पाण्याची अद्ययावत सुविधा चाळी , मध्यमवर्गीय घरे व झोपडपट्टी भागांत नसल्याने नागरिक वैतागले आहेत . प्रत्येक घरामागे दहा हजार लिटर पाण्याच्या टाकीची साठवण क्षमता असणे गरजेचे आहे . मात्र , चाळीस टक्क्यांहून अधिक परिसरात पाणी साठवण क्षमता अपुरी असल्याने पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे . बांधकामांना परवानगी देताना पाणी साठवण क्षमता पाहणे अत्यावश्यक आहे . मोशीतील आदर्शनगर , गंधर्वनगर , टेकाळेवस्ती , गणेश नगर , नागेश्वरनगर , नंदनवन आदी भागात रात्रीचा पाणीपुरवठा केला जात आहे.याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.