महापालिका निवडणूक ऑक्टोबर नंतरच!
-राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांची माहिती.
पिंपरी । लोकवार्ता-
राज्यातील मुदत संपलेल्या २२ महापालिकांसह, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. या निवडणुका जून व जुलैमध्ये घेण्यास निवडणूक आयोग तयार असल्याबाबतचे वृत्त चुकीचे असून तसे कोणतेही प्रतिज्ञापत्र आयोगाने सादर केलेले नाही. उलट पावसाळ्यात निवडणुका घेण्यास अडचणी असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली.

कोल्हापुरात २३ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेचा समारोप झाला. त्यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणाची सुनावणी २५ एप्रिलला होत आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यास राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागतील. कारण शेवटी तो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असेल. तेव्हा तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला. परंतु २५ एप्रिलला ही सुनावणी झाली नाही. ही सुनावणी आता ४ मे रोजी होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च प्रतिज्ञापत्र घालून न्यायालयात पावसाळ्यात निवडणुका घेण्यात असल्याचे स्पष्ट केले आहे. अडचणी एवढ्या सगळ्या निवडणुका एकाच टप्प्यात घेणेही शक्य नाही. त्या दोन तीन टप्प्यांत घ्याव्या लागतील, असेही आयोगाचे म्हणणे आहे. त्यामुळे ४ मे रोजी जरी सुनावणी झाली तरी जून जुलैमध्ये किंवा पावसाळ्यापूर्वी या निवडणुका होण्याची शक्यता नाही. दिवाळीनंतर या निवडणुकांचा बार उडणार आहे. ऑक्टोबरमध्ये जरी ही प्रक्रिया सुरू झाली तरी किमान ३५ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असतो. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपची राजकीय कुस्ती दिवाळीचे लाडू खावूनच होणार एवढे मात्र नक्की. २६ ऑक्टोबरला दिवाळी झाली की नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये निवडणुकीस कोणताही सण अथवा अन्य अडचण येणार नाही, असे चित्र आहे.