पिंपरी-चिंचवड मध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येणार
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आल्यानंतर येथे भरपूर विकासकामे झाली आहेत

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा पार्थ पवार हे लक्ष घालणार असले तरी त्यांना आम्ही सक्षमपणे तोंड देऊ, त्यांची जादू चालणार नाही, असा दावा भाजपचे आमदार आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे एक कारभारी लक्ष्मण जगताप यांनी केला.

“पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आल्यानंतर येथे भरपूर विकासकामे झाली आहेत. अजित पवार यांच्या हाती कारभाराची सूत्रे होती त्यापेक्षाही आम्ही जास्त कामे करू शकलो. म्हणूनच आम्हाला पुन्हा विजयाचा विश्वास आहे. “अजित पवार यांच्या सामर्थ्यापुढे लक्ष्मण जगताप किंवा महेश लांडगे हे टिकू शकतील का, या प्रश्नावर ते म्हणाले की ही लढाई अजित पवार विरुद्ध जगताप किंव लांडगे अशी नाही. ही लढाई भाजप विरुद्ध अजित पवार आहे. भाजपला मानणारा मोठा मतदार या शहरात आहे. आम्हाला थोडेच कष्ट घ्यायचे आहेत. भाजपने विकासकामे येथे केली आहेत. त्यामुळेच आम्हाला विजयाचा विश्वास आहे. असे लक्ष्मण जगताप म्हणाले.
पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण हे पीएमआरडीएमध्ये समावेश करण्याचा निर्णय अजित पवारांवर बूमरँग होणार असल्याचा दावाही जगताप यांनी केला. पिंपरी चिंचवडसाठी हा अतिशय चुकीचा निर्णय ठरला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तुम्ही खासगीत विचारले तरी तो त्याबद्दल नाराजी व्यक्त करेल. सिडकोची हद्द ज्याप्रमाणे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड प्राधिकरण हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करायला हवे. भाजप सरकार असतानाही ते पीएमआरडीएमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र मी, महेश लांडगे यांनी प्रयत्न करून तो हाणून पाडला, असेही त्यांनी नमूद केले. असं लक्ष्मण जगताप म्हणाले.
आगामी निवडणुकीसाठी एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीचा सरकारचा विचार आहे. भाजपसाठी ती अडचणीची ठरू शकते का, यावर ते म्हणाले की आम्हाला एक सदस्यीय असो दोन की चार सदस्यीय वॉर्ड पद्धत असो. त्याने काहीच फरक पडणार नाही. एक सदस्यीयमध्ये महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बडाळी होणारच आहे. वरिष्ठ नेते सत्तेसाठी एकत्र आले म्हणजे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर एकत्र येतात, असे नाही. त्यामुळे भाजपची कोणत्याही सदस्यीय पद्धतीत तयारी आहे. त्याची आम्हाला भीती वाटत नाही.
भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगेंसोबत असलेल्या मतभेदाच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. कार्यकर्त्यांच्या नेमणुकांवरून आमच्यामध्ये रस्सीखेच असते. मला माझ्या समर्थकांना आणि त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना पदे मिळावीत, असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र पालिकेच्या कारभारावर आम्ही त्याचा परिणाम होऊन देत नाही. त्यांचा आणि माझा सवाद आहे. आमच्या दोघांमध्ये काही सामंजस्य होत नसल्यास आम्ही देवेंद्र फडणवीस किंवा पक्षाच्या इतर नेत्याकडे जातो. त्यात वावगे काही नाही, असे लक्ष्मण जगताप यांनी स्पष्ट केले .