परांजपे बंधु फसवणूक प्रकरणी ताब्यात
मुंबई पोलिसांनी परांजपे बंधूंना पुण्यातून मुंबईला आणलं

लोकवार्ता । प्रतिनिधी
मुंबई पोलिसांनी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीकांत परांजपे, शशांक परांजपे बंधुंना फसवणूक प्रकरणी पुण्यातून गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले.
परांजपे बंधुं यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बनावट कागदपत्रं तसंच फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

एका ७० वर्षीय वृद्ध महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी श्रीकांत परांजपे, शशांक परांजपे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रात्रीच चौकशीसाठी परांजपे बंधूना मुंबईतून पुण्यात नेलं. दरम्यान ही अटक नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
पोलीस उपायुक्त मंजूनाथ सिंगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “कलम ४०६, ४२०, ४६४, ४६७ आणि ४६८ अंतर्गत विले पार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ७० वर्षीय महिलेने श्रीकांत परांजपे, शशांक परांजपे तसंच आर पाटील नावच्या एका व्यक्तीविरोधात व्यवसायात फसवणूक केल्याची तसंच बनावट दस्तऐवज वापरल्याची तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली”.
“महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुरुवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी परांजपे बंधूंना पुण्यातून मुंबईला आणलं. चौकशी सुरु असून अटक केली असं म्हणू शकत नाही,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दोन्ही बंधूंवर बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.