मोशी येथील ग्रामदैवत नागेश्वर महाराजांच्या उत्सवातील मानाच्या लिंबू,ओटी,विड्याचा लिलाव उत्साहात पडला पार
-या वर्षीचा सुरवातीचा लिलाव अतिष बारणे यांनी घेतला. मानाची ओटी निलेश बोराटे यांनी ३९ लाख दोन हजार बावीस (३९,०२,०२२) रुपये किंमतीला घेतली. तर शेवटचा मानाचा विडा गणेश कुदळे यांनी ९१ लाख रुपये बोली लावून घेतला. यापूर्वी देखील शेवटचा मानाचा विडा गणेश कुदळे यांनीच घेतला होता.
मोशी | लोकवार्ता-
पंचक्रोशीत प्रख्यात असलेल्या मोशी येथील ग्रामदैवत नागेश्वर महाराजांच्या उत्सवातील मानाच्या लिंबू,ओटी,विड्याचा लिलाव उत्साहात पार पडला . नागेश्वर महाराज उत्सवाला शिवरात्री पासून सुरुवात झाली असून परंपरागत लिलाव नागेश्वर महाराज मंदिर सभागृहात पार पडला.उत्सवात वापरल्या गेलेल्या वस्तुंचा लिलाव तब्बल लाखोंच्या घरात गेला आहे.नागेश्वर महाराजांबाबत मोशीकरांची मोठी श्रद्धा असून वस्तुंच्या लाखोच्या बोलीतून श्रद्धा व्यक्त होताना दिसून येतो. मोशीतील नागेश्वर महाराज सभामंडपामध्ये सकाळी १० वाजल्यापासून लिलावाला सुरवात झाली . मोशीतील ग्रामदैवत श्री.नागेश्वर महाराज यात्रा उत्सवाची सुरुवात झाली असून भंडारा उत्सवामध्ये लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचे चित्र दिसून आले.महाशिवरात्री नंतर मोशी यात्रेस सुरुवात होते.सर्वप्रथम भंडारा उत्सव,उरूस, लिलाव,आखाडा असे स्वरूप असते . भाविकांनी मंदिर परिसर व आमराईतील नंदादीप परिसरात गर्दी केली होती.यात्रा कालावधी मध्ये गावातील शिवाजी महाराज प्रवेशद्वार,मंदिरे,शाळा इमारती वरील करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरत होती.शहर परिसर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ दरवर्षी भंडारा उत्सवामध्ये सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतात.

भंडाऱ्याच्या दिवशी ग्रामस्थांकडून बुंदी व शेकभाजी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.आमराईमध्ये होम,हवन,महापूजा,आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविक भक्तांची वर्दळ सुरु होती.सायंकाळ नंतर भाविकांच्या पंगती बसून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.गुरुवारी सुरु झालेल्या लिलावासाठी ग्रामस्थांनी सकाळपासुनच मंदिरात हजेरी लावली होती.उत्सवातील वस्तूंचा लिलाव हा पंचक्रोशीतील भाविकांच्या दृष्टीने एक विशेष पर्वणीचा सण असतो.त्यामुळे लिलाव पाहण्यासाठी सभा मंडपामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.दरवर्षी या लिलावामध्ये भाविकांना अर्पण केलेल्या वस्तूंची विक्री केली जाते.त्यामध्ये प्रामुख्याने नारळ,पेढे,फोटोसह महाप्रसाद बनविण्यासाठी आणलेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात येतो.ग्रामस्थांकडून महाप्रसाद बनविण्यासाठी लागणारी भांडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात.दरवर्षी प्रमाणे या वर्षीही बोली लावण्याचे काम नारायण केदारी ,सागर केदारी,निखिल केदारी यांनी केले.
चौकाट:या वर्षीचा सुरवातीचा लिलाव अतिष बारणे यांनी घेतला. मानाची ओटी निलेश बोराटे यांनी ३९ लाख दोन हजार बावीस (३९,०२,०२२) रुपये किंमतीला घेतली. तर शेवटचा मानाचा विडा गणेश कुदळे यांनी ९१ लाख रुपये बोली लावून घेतला. यापूर्वी देखील शेवटचा मानाचा विडा गणेश कुदळे यांनीच घेतला होता.