छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेत नौदलाच्या झेंड्यावर अवतरले नवे बोधचिन्ह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा.
आजचा दिवस हा भारतीय नौदलासोबतच मराठी माणसांसाठी खास दिवस आहे. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नवीन नौदल चिन्हाचे अनावरण केले. नौदलाचा नवा ध्वज जवानांना नवी उर्जा देईल. आजपासून नौदलाचा नवा ध्वज फडकत राहिल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत असल्याचे म्हटले आहे
आयएनएस विक्रांतमध्ये 2300 कंपार्टमेंट असून 14 डेक आहेत. ही नौका 1500 जवानांना नेण्यास सक्षण असून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी याच्या स्वयंपाकघरात 10 हजार रोट्या बनवता येणार आहेत. या नौकेत 88 मेगावॅट वीज आणि चार गॅस टर्बाईन आहेत. याची सर्वाधिक गती 28 समुद्रमैल एवढी आहे. ही युद्धनौका बनवण्यासाठी 20 हजार कोटींचा खर्च आला आहे. आत्मनिर्भर भारताचे हे आदर्श उदाहरण असून मेक इन इंडिया उपक्रमावर भर देण्यात आला आहे.

याचे वजन 45 हजार टन म्हणजे फ्रान्समधील चार आयफेल टॉवरएवढे असून त्याच्या वजनापेक्षा चारपच जास्त लोखंड आणि स्टील यात वापरण्यात आले आहे. याची लांबी 262 मीटर आणि रुंदी 62 मीटर म्हणजे दोन फुटबॉल मैदानाएवढी आहे. या स्वदेशी युद्धनौकेत 76 टक्के स्वदेशी उपकरणे वापरण्यात आली आहेत. 450 किलोमीटर मारक क्षमता असलेले ब्रम्होस क्षेपणास्त्रही यावर तैनात करण्यात येणार आहे. यावर 30 एअरक्राफ्ट तैनात करता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलात दाखल करण्यात आली. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही पहिली स्वदेशी युद्धनौका आहे. 2009 मध्ये या युद्धनौकेच्या बांधणीला सुरुवात झाली. आता 13 वर्षांनतर ती नौदलात दाखल होत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते नौदलाच्या नव्या चिन्ह्याचेही (Ensign) अनावरण करण्यात आले.
आयएनएस विक्रांतमुळे स्वदेशी तंत्रज्ञान वापरून विशालकाय विमानवाहू युद्धनौका तयार करणाऱ्या देशात आता हिंदुस्थाननेही मानाचे स्थान पटकावले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आयएनएस विक्रांतमुळे देशात नवा विश्वास आणि सामर्थ्य निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. लक्ष्य दूर आहे, प्रवास अनेक आहेत, समुद्र अनंत आहे, तर हिंदुस्थानकडे विक्रांत हे उत्तर आहे. स्वातंत्र्य अमृत महोत्सवात अतुलनीय अमृत म्हणजे विक्रांत. आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब म्हणजे विक्रांत, असेही ते म्हणाले.
केरळच्या समुद्रतळावर हिंदुस्थानी नव्या भविष्याचा सूर्योदयाचे साक्षीदार आहेत. हिंदुस्थानच्या बुलंद ध्येयाचा हा हुंकार आहे. विशाल, विराट, विशिष्ट असे विक्रांत आहे. ही फक्त युद्धनौकाच नाही, तर 21 व्या शतकातील हिंदुस्थानचे परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि कटिबद्धता सिद्ध करणारी युद्धनौका, असेही मोदी म्हणाले. आयएनएस विक्रांत आगामी 25 वर्षांची राष्ट्र सुरक्षा आणि आपले संकप्ल दर्शवते, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.