“दिल्ली समोर महाराष्ट्र कधीही झुकत नाही”
आम्हाला याची भीती वाटत नाही

लोकवार्ता । प्रतिनिधी
“छत्रपतींचे नाव भाषणात घेणारे दिल्लीतील नेते हे छत्रपतींच्या विचारांकडे दुर्लक्ष करतायत. छत्रपतींनी कधी महिलांना टार्गेट केले नाही. मात्र मुघलांनी महिलांवर अत्याचार केले होते.” याची आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना करुन दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच, “मला माझ्या बहिणींच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. तीनही बहिणी खंबीर आहेत, त्या यातून बाहेर पडतील. ” असंही यावेळी त्यांनी बोलून दाखवलं.
“काल जेव्हा आमच्या बहिणींच्या ठिकाणांवर आयकर विभागाने धाड टाकल्याबद्दल कळलं तेव्हा धक्का बसला. ही दुर्दैवी गोष्ट आहे.” असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, “मला माझ्या बहिणींच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. तीनही बहिणी खंबीर आहेत, त्या यातून बाहेर पडतील. जिजाऊ, सावित्रीमाईंच्या मातीत माझ्या बहिणी जन्माला आलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला याची भीती वाटत नाही.” असं सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवलं.
“केंद्र सरकार आणि दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही आणि झुकणारही नाही. लखीमपुरची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. सत्ता कुणाचीही असली तरी अशा घटनांचा निषेधच केला पाहिजे.” असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.