शेतकऱ्यांना पीक विम्याची पुरेशी रक्कम मिळणार कधी ?
…तर शेतकऱ्यांना पीकविम्याचे ४००० कोटी रुपये मिळाले असते”; देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप.
पिंपरी।लोकवार्ता-
राज्याने गेल्या वर्ष-दीड वर्षात अनेक नैसर्गिक आपत्ती बघितल्या. वादळ, अतिवृष्टी, महापूर या सगळ्यामुळे राज्याचं अतोनात नुकसान झालं. याची झळ बसली ती मुख्यतः राज्यातल्या बळीराजाला. या नुकसानीची भरपाई योग्य त्या प्रमाणात न मिळाल्याने विरोधी पक्षाने आता चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी निवडणुकांमध्ये पीकविमा आणि नुकसान भरपाईचा मुद्दा हा भाजपाच्या प्रचारातल्या मुद्द्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार असं चित्र दिसत आहे. याच मुद्द्यावरुन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर चांगलीच फटकेबाजी केली आहे.

नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी इथं देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची पुरेशी रक्कम मिळालेली नाही, आपल्या सरकारच्या काळात आपण किती रक्कम प्रत्येक जिल्ह्याला दिलेली होती, हे मुद्दे त्यांनी या भाषणात अधोरेखित केले.
“भागवत कराड हे वित्तराज्यमंत्री झाल्यावर आम्ही त्यांना विचारलं की पीकविमा आपल्या काळात मिळत होता, आता तो का मिळत नाही? यावर त्यांनी विमा कंपन्यांची बैठक बोलावली. त्या विमा कंपन्यांनी धक्कादायक सत्य आपल्यासमोर आणलं. ते म्हणाले, विमा देणार कसा? सरकारच्या हिश्श्याचे जे १७०० कोटी रुपये सरकारने भरायला हवे होते, त्यातला एक नवा पैसा त्यांनी भरलेला नाही. तो जर भरला असता तर ४००० कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना दिले असते. पण जर पैसेच भरले नाहीत, तर विम्याचे पैसे येतील कसे? म्हणजे यांच्याकडे चैनीला पैसा आहे, पण शेतकऱ्यांना हक्काचे पैसे राज्य सरकार भरत नाही म्हणून शेतकरी संकटात आहे”.असा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.